Friday, September 2, 2011

असा बालगंधर्व आता न होणे - भाग 3


बालगंधर्व... मनस्वी कलावंत, प्रामाणिक करदाताही!

वैभव वझे : सकाळ वृत्तसेवा

मुंबईपद्मभूषण नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारचा प्राप्तिकर आणि करमणूक कर कधीही चुकवला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. 1 जून 1921 ते 1928 अखेर या 80 महिन्यांच्या आर्थिक नोंदींच्या एकत्रित नोंदीत बालगंधर्वांनी या काळात 12 हजार 648 रुपये 8 आणे प्राप्तिकर आणि 38 हजार 548 रुपये करमणूक करापोटी सरकारकडे भरले होते. 

बालगंधर्वांचे सख्खे बंधू आणि गंधर्व नाटक मंडळीचे व्यवस्थापक बापू उर्फ व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांच्या 1935 मधील रोजनिशीतील वरील नोंदी आहेत. वरील 80 महिन्यांत गंधर्व नाटक मंडळीला एकूण 11 लाख 1 हजार 326 रुपये 13 आणे उत्पन्न झाले होते. याच काळातील कर, भाडे, मानधन असा एकूण खर्च 8 लाख 59 हजार 800 रुपये 14 आणे झाला होता. त्यानंतर 1928 ते मे 1931 पर्यंतच्या 40 महिन्यांत गंधर्व नाटक मंडळीने सरकारकडे 10 हजार 239 रुपये प्राप्तिकर भरला होता. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांच्या कन्या आणि बालगंधर्वांच्या पुतणी नीलांबरी ऊर्फ नीलांबरी ज्ञानेश्वर बोरकर म्हणाल्या, माझे वडील गंधर्वा नाटक मंडळीत व्यवस्थापक होते. कंपनीचा रोजचा खर्च तेच पाहायचे. तसेच बारीकसारीक नोंदी लिहून ठेवायचे. बालगंधर्वांचा स्वभाव दिलदार असल्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालण्याची जबाबदारी बापूंवर असायची. 1935 नंतर गोहरबाई कर्नाटकी यांनी बापूंना व्यवस्थापक पदावरून दूर केले. पुढे बापू मळवली येथे स्थायिक झाले. 

बालगंधर्व यांच्यावरील चित्रपटाने वातावरण गंधर्वमय झाले असतानाच बालगंधर्वांच्या स्वभावाचे अनेक पैलू समोर येत आहेत. बालगंधर्वांच्या सचोटी आणि प्रामाणिकपणाचे गोडवे आजही गायले जातात. बालगंधर्व हे प्रामाणिक करदाते होते, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. 
प्राप्तिकर विभाग दरवर्षी प्रामाणिक करदात्यांची यादी प्रसिद्ध करतो. त्यामध्ये कलावंतांची, खेळाडूंची तसेच औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली जातात; परंतु याच क्षेत्रांतील अनेक लोक प्राप्तिकराचा भरणा प्रामाणिकपणे करत नाहीत हे उघड झाले आहे. स्वतःची कंपनी आर्थिक अडचणीत असताना, तिची सतत फिरती सुरू असताना, कंपनीतील प्रत्येकाला सुग्रास भोजन, प्रत्येकाच्या कुटुंबीयांना सणासुदीला आहेर, नाटकासाठी केला जाणारा वारेमाप खर्च असे अनेक खर्च करतानाच बालगंधर्वांनी कधीही प्राप्तिकर चुकवला नाही, याची नोंद प्रत्येक कलावंताने घ्यायला हवी.
व्यंकटेश उर्फ बापू राजहंस यांच्या रोजनिशीतील मजकूर

गंधर्व नाटक मंडळी
तपशील 1 जून 1921 ते 1928 अखेर 
रुपये.आणे.पैसे
भोजन खर्च 165820.15.6
थिएटर भाडे 156210.14.6
पगार कपडे 146870.14.3
प्रवास खर्च, गाडीभाडे 28484.7.9
घरभाडे 25298.9.3
छपाई जाहिरात 33492.8.6
ड्रेस, धुलाई, सीनसिनरी 85513.14.6
स्टेशनरी, औषधे 23391.13.6
धर्मादाय देणग्या 25445.8.9
इन्कमट्यॅक् 12648.8.0
करमणुकीचा कर 38548.0.0
कोर्ट खर्च 9660.0.0
नाटककर्त्यास दिले 15234.0.0
कमिशन 3540.7.3
व्याज 1481.6.0
विमा 15159.4.0
धर्मार्थ खेळ 0.0.0
इलेक्ट्रिक खर्च 0.0.0
थिएटर खर्च 0.0.0
किरकोळ 0.0.0
श्री. नारायणराव 63080.4.0
घरखर्च 0.0.0
----------------------------
एकूण खर्च 859800.14.3
---------------------------
एकूण उत्पन्न 1101326.13.0

Thursday, August 4, 2011

असा बालगंधर्व आता न होणे - भाग २

बालगंधर्वाच्या पहिल्या भागात आपण त्यांच्या संगीत नाटकाच्या सुरुवातीबद्दल बोललो. त्यालाच पुढे नेऊन काही नवीन गोष्टी येथे सांगत आहे.
नारायणरावांची संगीत नाटके सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय होत होती तसतसे त्यांचे चाहते हजारोंच्या संख्येत वाढत होते. त्यांची कीर्ती दूरवर पोहोचली होती.
त्या काळात आजच्या सारखी संपर्क माध्यमांची रेलचेल नव्हती तरीदेखील बालगंधर्वांचे चाहते महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश,कर्नाटक आणि तामिळनाडू इथपर्यंत पसरले होते.
त्याबद्दलचा एक छोटा पुरावा म्हणून मी इथे एका गुजराथी ग्रामोफोन वरील मुखपृष्ट देत आहे.



बालगंधर्वांची नाट्यगीते प्रचंड लोकप्रिय होत होती आणि म्हणूनच ग्रामोफोनच्या कंपनीने त्याची रेकॉर्ड काढली.त्याची काही छायाचित्रे येथे देत आहे.
( लक्षात घ्या १९१० साली ह्या सर्व गोष्टी घडत आहे. त्या काळात संगीत नाटकाला एवढी प्रतिष्ठा आणणे एक चमत्कारच म्हणावे लागेल)




गंधर्व नाटक मंडळी चे अजून एक वैशिष्ट म्हणजे साथीला असणारे उस्ताद अहमद थिरकावा आणि मुल्लाजी कादरबक्ष. हे दोघे त्या काळातील सुप्रसिद्ध आणि अव्वल दर्जाचे वादक होते.संगीत नाटकामध्ये या दोघांची जुगलबंदी हे देखील एक प्रमुख आकर्षण होते.अहमद थिरकावा या मुलाचे आडनाव थिरकावा हे नव्हते. तबल्यावरील हात असा काही चाले कि ते पाहून त्यांच्या गुरूने त्यांना 'थिरकावा' हे नाव बहाल केले.( म्हणजे वीज कडाडल्यावर जशी कंपने होतात तशी त्यांच्या बोटाने तबल्यावर होत )

उस्ताद अहमद थिरकावा यांना भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब देखिल मिळाला होता. म्हणजे पहा. किती महान कलावंत होता हा.
कादरबक्षांचे देखील असेच. सारंगी मध्ये त्यांचा हात धरणारा हिंदुस्थानात शोधून सापडणे अवघड. कादरबक्षांचे लवकर निधन झाले आणि त्यानंतर त्यांचा मुलगा देखील गंधर्व नाटक मंडळी मध्ये सारंगी वाजवत असे. पण नंतर त्याने पुण्यात सारंगी वादनाच्या शिकवण्या सुरु केल्याची नोंद आढळते.










बालगंधर्वांच्या नाटक मंडळीतील हि स्वर-मंजुषा बालगंधर्व रंगमादिरात आहे. आचार्य अत्रे ती यांनी खरेदी करून पुणे महानगर पालिकेस भेट म्हणून दिली.

नाटकामध्ये पहिला मखमली पडदा हा गंधर्व नाटक मंडळीच्या नाटका मध्ये आला. बालगंधर्वांनी 'द्रोपदी' नाटकसाठी १.५ लाखाचे कर्ज घेऊन मयसभा उभी केली.
( पुनश्च आठवण : या काळात सोन्याची किमत १० रुपये तोळा .
कल्पना करा १.५ लाख केवळ रंगमंचासाठी.)

मात्र हे नाटक रंगभूमीवर यशस्वी झाले नाही आणि गंधर्व कंपनी कर्जात बुडाली.सावकार पैशासाठी तगादा लाऊ लागले. रसिकांनी तेंव्हा १.५ लाखाची थैली करून दिली. पण बालगंधर्वांनी नम्रपणे नाकारून पुढे १० वर्षात ते कर्ज फेडले. स्वाभिमान म्हणा किंवा दुर्दम्य आत्मविश्वास.
हे सांगायचा उद्देश असा कि त्या काळातील सर्वोत्तम लोक हे गंधर्व नाटक मंडळी मध्ये होते आणि गंधर्व नाटक मंडळी मध्ये काम करणे हे मोठे अभिमानाचे लक्षण मानत.
हे सर्व मोठे पैसे खर्चून केवळ रसिक मायबाप डोळ्यासमोर ठेवून बालगंधर्वांनी एक संगीत पिढी घडवली.
अत्तुच्य दर्जाच्या आदर्श अश्या संगीत नाटकाचा अनुभव घेण्याचे भाग्य मराठी रसिकांना बालगंधर्वमुळे मिळाले.खरच मराठी रसिक भाग्यवान आहेत.

खरच खूप गोष्टी आहेत सांगायला पण आपली गोष्ट पुढे सरकणार नाही. तेंव्हा मी आता येथे थांबवतो आणि पुढच्या भागात नवीन घडामोडी टाकण्याचा प्रयत्न करतो.
मला इंटरनेट, पुस्तके यातून बरेच संदर्भ , फाईल मिळत आहेत. मी त्यात येथे आट्याच करत आहे.




Saturday, July 30, 2011

असा बालगंधर्व आता न होणे - भाग १




मित्रानो , बालगंधर्व सिनेमा पहिल्यापासून मला त्यांच्याबद्दल मनात कुतूहल निर्माण झाले.आपसूकच त्यांची माहिती मिळवण्यासाठी मी पुस्तके, गुगल, यु टूब,वर्तमान पत्रातील लेख, बालगंधर्वांची प्रदर्शनी मिळेल त्या ठिकाणी हजेरी लावू लागलो. पण मला इंटरनेट वर त्यांची खूप अल्प आणि अपुरी माहिती मिळाली, म्हणून स्वतःच त्यांच्याबद्दल जेवढी माहिती शक्य आहे ते लिहिण्याचा हा प्रयत्न. एखाद्या गोष्टीचे वेड लागल्यावर आपण जसे भारावून जातो तो अनुभव अश्या धकाधकीच्या जीवनात खूप दिवसांनी मिळाला.
नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्म १८८८ साली पुण्यात झाला.मुळचे सांगली जिल्ह्यातील असलेले बालगंधर्व जन्माने पुणेकर होते.वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी एका मैफिलीत गायलेले गाणे लो. टिळकांनी ऐकले आणि त्यांना 'बालगंधर्व' पदवी बहाल केली. नारायण रावांनी देखील पुढील आयुष्यात ती सार्थ ठरवली आणि संगीत नाटकात एक अजरामर इतिहास घडवला.
नारायण राव आपल्या प्रेक्षाना नेहमी माय-बाप म्हणून संबोधित. बालगंधर्व नेहमी म्हणत ' माय -बाप रसिकांनो मला नेहमी 'बाल' च राहू द्या आणि माझी सतत संगीत शिकत राहायची इच्छा आहे.'
उणेपुरे ८० वयोमान लाभलेल्या या संगीत नटसम्राटाला आयुष्यात मात्र जीवनातील अत्त्युच्य शिखर आणि विदारक दुख या दोन्हीशी सामना करावा लागला.नारायणरावांचे चरित्र अतिशय रंजक आणि १०० वर्षानंतर देखील कोणालाही प्रभावित करणारे आहे.

नारायणरावांनी १९०५ साली 'किर्लोस्कर नाटक मंडळी' मध्ये प्रवेश केला. 'संगीत शांकुतल' नाटकाद्वारे त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले आणि रसिकांना अक्षरश: वेड लावले.

नाटकात नारायणराव शंकुतला स्त्री पात्र करत .नारायणराव जन्मजात सुंदर... अभिनयातील नजाकतीचे दर्शन आपल्या स्त्री पत्राद्वारे रंगभूमीवर दाखवून रसिकांच्या हृदयात अढळ असे स्थान निर्माण केले. याच्या साथीला त्यांचा गोड गळा. नाटकातील पदे म्हणताना प्रत्त्येक शब्द हा अगदी साखरेच्या पाकात घोळून यावा तसा त्यांच्या गळ्यातून येत असे.संगीत नाटक आणि किर्लोस्कर नाटक मंडळी दोन्ही गोष्टींचा भरभराट होत होता. याला कारण नारायणरावांचे गाणे आणि अभिनय.पण पुढे नारायण रावांचा खर्च अवाजवी होऊ लागला आणि त्यात वाद होऊन नारायणराव , गोविंदपंत टेंबे व गणेश बोडस यांनी नाटक कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.१९१३ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत ढमढेरे बोळात 'गंधर्व नाटक मंडळी' ची स्थापना झाली.

१९०६ ते १९३३ हा बालगंधर्वांचा आणि संगीत नाटकाचा सुवर्णकाळ ठरला।नारायणरावांची स्त्री पात्रे भलतीच लोकप्रिय होऊ लागली. सुभद्रा, शंकुतला,भामिनी, शारदा अशी भव्यदिव्य पात्रे तर 'एकाच प्याला' मधील जीर्ण साडीमधील सिंधू पाहून रसिक थक्क झाले. त्या काळात बालगंधर्व म्हणजे एक ' स्टाइल आयकोन ' बनले होते. बालगंधर्वांच्या भरजरी साड्या,नक्षीदार दागिने याची स्त्रीयांना भुरळ पडली नसती तर नवल.अगदी साबण,सौंदर्य प्रसाधने यावर देखील बालगंधर्वाचे चित्र असायचे.बालगंधर्वांचे नाटक पाहणे म्हणजे एक स्वर्ग अनुभव असे.
त्याला कारणही तसे असे.रंगमंचावर प्रकाश आणि रंगांची इतकी विलक्षण उधळण असे कि रसिक मायबापांचे डोळे दिपून जात असे. ज्या काळात सोने १० रुपये तोळा या भावात मिळत होते त्या काळात ७५ हजारांचे रंगमंच उभारून संगीत नाटक आणि रसिक मायबाप यांच्यावरील नारायणरावांच्या प्रेमाची जाणीव होते.
नाटकाला येणाऱ्या रसिकवर उंची अत्तरांचा फवारा.रंगमंचावर सुंदर मखमली पडदे, मुलायम गालिचे,सिंहासन ,प्रकाशाचा लखलखाट. प्रत्तेक पात्राची वस्त्रे मखमली कापडाची. सोन्याच्या मुलामा दिलेले दागिने, मुकुट.मंत्रमुग्ध होऊन जावे असा आवाज. तबला आणि सारंगीची अप्रतिम साथ.
बालगंधर्वांनी 'अमजदखान थिरकांवा' यांना खास बोलावून जास्त मानधन देऊन नाटक कंपनी मध्ये ठेवले. सारंगी वर 'कादरबक्ष' असत. नाटकात हे दोघे असा काही जल्लोष उडवून देत कि बस.याच बरोबर हार्मोनियम वर हरिभाऊ देशपांडे असत.गंधर्व नाटक मंडळीचे नाटक मात्र नेहमी उशिरा सुरु होत आणि पहाटे उशिरापर्यंत चालत. बालगंधर्व स्वतःची रंगभूषा आणि वेशभूषा स्वतः करत.ते अगदी 2 - 4 तास चालत असे।
पडदा उघडण्या आधी 'नांदी' चे सूर कानावर पडत असत.' कालिदास कविराज रचित हे , गानी शाकुंतल रचितो......'आणि मग नाटकामधील अवीट गोडीची पदे.स्वयंवर नाटक जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेव्हा बालगंधर्व सलग ६-६ वेळा वन्स-मोर घेत. साहजिकच नाटक पहाटे ४.३० च्या आसपास संपत असे।

नाटक संपल्यावर सर्व रसिकांना पहाटे घुंगुर मास आणि गरम खिचडीचे जेवण मिळत असे।
(काय मंतरलेले दिवस होते ना ते. मला तर नुसत्या कल्पनेने शहारून जाते.पूर्वी पुण्यात दगडूशेठ ला संगीत महोत्सवाचे कार्यक्रम चालत कोतवाल चावडी ते समाधानच्या चौकात असत त्याची आठवण होते. आता नवीन नियमामुळे १० ला कार्यक्रम बंद करावा लागतो।)

हे झाले नाटकाचे. पण नाटकातील कलाकारांची देखील खास देखभाल असे. गंधर्व नाटक कंपनीत साधारण १५० लोक होते. रोज १५० लोकांची पंगत असे. चांदीच्या ताटातून पंचपक्वान्नाचे जेवण असे.तसेच नाटकाचे कपडे धुण्यासाठी परीट,न्हावी असे सर्व वेगळे. नारायण रावांचे स्वता:चे परीट,न्हावी खास वेगळे होते.नाटकाचे सामान एवढे होते कि नुसते ते दौराच्या ठिकाणी हलवायला रेल्वे च्या ६ बोगी लागत होत्या।

साहजिकच एवढा सगळा लवाजम चालवायचा म्हणजे पैसे खर्च वाढला. त्यात नारायणरावांचा अवाजवी खर्च देखील नियंत्रणाबाहेर गेला.केवळ गालिच्यासाठी १६ सहस्त्र रुपये खर्ची पाडत. अर्थात नाटक कंपनी आणि बालगंधर्व यांच्यावर प्रेम करणारी माणसे होती आणि त्यामुळे या सर्व गोष्टी निभावून जात होत्या.पण गंधर्व नाटक मंडळी वर कर्ज वाढत होते।
बालगंधर्वांच्या गाण्यावर फिदा असणारे अनेक धनिक रसिक चाहते होते. त्यातील एक म्हणजे शेठ लक्ष्मिचंद थेट कराची मधून.

पुण्यातील पेरूची बाग म्हणजेच सध्याचे पुणे आकाशवाणी केंद्र. अनेक दिवस नारायण राव या जागेचे मालक होते हे अनेक जणाना ऐकून आश्चर्य वाटेल.

नारायणराव आणि केशवराव भोसले यांनी मिळून एक संयुक्त मानापमान चा प्रयोग केला आणि त्याचे प्रवेशिका दर होते १०० रुपये. तरीदेखील सर्व प्रवेशिका संपल्या.यावरून बालगंधर्व किती लोकप्रिय होते याची प्रचीती येते.साधारण १९३१ च्या आसपास पहिला बोलपट आला आणि तिथून पुढे संगीत नाटकाला उतरती कळा लागली.
-----------
क्रमश: